विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
श्रीरामपूर:- चारचाकीमध्ये गावठी उमर्टीकडून पिस्तूल घेवून जाणार्या आंतरजिल्हा टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून मुसक्या आवळल्या आहे. राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण वय 32, मूळ रा. खंडाळा, ह. मु. वॉर्ड क्र. 3 श्रीरामपूर जि. अहमदनगर व गणेश ज्ञानेश्वर सातपुते वय 23, रा. शिरसगाव, जि. अहमदनगर या दोघांकडून चार पिस्तूल व दहा काडतूस जप्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील उमर्टी येथे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेण्यासाठी एमएच 15 डीएम 7778 क्रमांकाची कार तिच्या नंबर प्लेटवर ‘अध्यक्ष टायगर ग्रुप, श्रीरामपूर’ असे लिहिलेली पांढर्या रंगाची कार गेली असून ती पिस्तूल घेऊन चोपडामार्गे अहमदनगर येथे जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले. उमर्टी येथून संशयित चोपड्यातील शिवाजी चौकात येणार असल्याने पोलिसांनी रस्त्यात सापळा रचला. ती कार चोपड्याकडे येताना दिसताच पथकाने कारला चारही बाजूंनी घेरले आणि त्यातील दोघांची चौकशी करण्यास सुरुवात केली. पथकातील कर्मचार्यांनी कारची झडती घेतली असता, त्यांना कारच्या पायदानाखालून 4 गावठी पिस्तूल तर राजेंद्र उर्फ पप्पू चव्हाण व गणेश सातपुते या दोन्ही संशयितांच्या खिशातून प्रत्येकी पाच जिवंत काडतूस आढळले.
आरोपींकडून तीन मोबाईल व कार जप्त करण्यात आले. या पथकाची कामगिरी ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, पोलिस उपअधक्षक ऋषीकेश राऊले, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन यांच्या पाटील मार्गदर्शना खाली पोऊनि अमोल देवढे, सुनिल दामोदरे, महेश महाजन, रविंद्र पाटील, परेश महाजन, दीपक कुमार शिंदे, मुरलीधर बारी यांच्या पथकाने कामगिरी केली.

