✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- राष्ट्रीय कैडेट कोर म्हणजेच एनसीसी बटालियनअंतर्गत एसएसएनजे महाविद्यालयातील छात्र सैनिकांनी 5400 फूट उंचीवर असलेले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ वर 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास चढाई करून तिरंगा फडकवत आपले साहस दाखवले.
सैनिकांना साहसी, निर्भीड व कर्तव्यदक्ष नागरिक घडविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच साहस प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून ‘ट्रेकिंग’चे प्रशिक्षण देण्यात येते. दोन दिवसीय कळसूबाई ट्रेकिंग मोहिमेची सुरुवात दि. १५ नोव्हेंबर रोजी बारी ग्राम येथून दुपारी ४ वाजता झाली. सायंकाळी शिखराजवळ पोहचून तेथे रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता ‘ट्रेकिंग’ला सुरुवात करून ६ वाजता शिखरावर पोहचून छात्र सैनिकांनी तिरंगा फडकविला.
अभियानाचे आयोजन हिमगिरी ट्रेकर्स, मुंबईचे संचालक संतोष तेलंगे व सोनाली तेलंगे यांनी केले होते. कळसूबाई ट्रेक अभियान एनसीसी अधिकारी तथा रोव्हर लिडर कॅप्टन मोहन गुजरकर, वैशाली गुजरकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. अभियानात २० मुली व १४ छात्र सैनिकांनी सहभाग घेतला होता. सैनिकांचे नेतृत्व सिनिअर अंडर ऑफिसर भाविक आखूड याने, तर मुलींचे नेतृत्व अंडर ऑफिसर दीक्षिका महेशगौरी यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348