✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा/हिंगणघाट:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हिंगणघाट येथे राहणाऱ्या दोन तरुणाचा नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याचे समोर येत आहे. भरधाव कंटेनरने समोरुन येणाऱ्या इलेक्ट्रीकवरील दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळच्या सुमारास झाला. विशेष म्हणजे इलेक्ट्रीकवरील दुचाकी जळून खाक झाली. धनराज शेषराव वासाड वय 27 वर्ष, प्रितम जगदीश टेभुंळकर वय 25 वर्ष दोन्ही रा. हिंगणघाट असे मृतकांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक धनराज वासाड आणि प्रितम टेभुंळकर हे दोघे तरुण बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकीने जामकडून नागपूरकडे जात असताना खंडाळा शिवारात जामकडे भरधाव येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर दुचाकी जळून कोळसा झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल दहिभाते, पोलीस उपनिरीक्षक पंकज मसरामसह पोलीसांनी अपघातस्थळी जात कंटेनरचालकास अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348