महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- पंचायत राजव्यवस्थेसह ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करताना सहकार क्षेत्रासह साहित्य, समाजकारण, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रात दिशादर्शक काम करणारे व राज्याच्या राजकारणातील मापदंड असलेले स्व. यशवंतराव चव्हाण यांनीच महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला असून ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मॉडेल स्कूलच्या प्रांगणात यशवंत तीर्थ येथे 38 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी समवेत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर प्रा. व्हि. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, प्राचार्य जे. बी. शेट्टी, श्रीमती शीतल गायकवाड, श्रीमती अंजली कन्नमवार, नामदेव गायकवाड, प्रा. जी. बी. काळे आदी उपस्थित होते. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान असे केंद्रात विविध पदे भूषवताना त्यांना कधीही साधेपणा सोडला नाही. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठे योगदान त्यांचे राहिले. याचबरोबर राज्याच्या कृषी, औद्योगिक क्रांतीचा पाया त्यांनी घातला. आजच्या राजकारणातही यशवंतराव चव्हाण हे प्रत्येकाला आदर्शवत असून पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात यशवंतपर्व कायम राहिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेक धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348