सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 7 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी.बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख वक्ता आर.बी. अलाम (शिक्षक), प्रमुख पाहुणे एम.डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक) तसेच प्रमुख उपस्थिती यु.के. रांगणकर सर यांची होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसमोर दीप प्रज्वलित करून, माल्यार्पण करण्यात आले.
शाळेच्या विद्यार्थीनी कुमारी राशी राहुल वेले आणि कुमारी रूपाली मनोज निमकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर माहिती सादर केली. एम.डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना सांगितले की, त्यांनी गरिबीतून मार्ग काढून शिक्षण घेतले आणि देशाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य केले.
यावेळी आर. बी. अलाम (प्रमुख वक्ता) यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना, दिवाबत्तीची सोय नसतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले. त्यांची बुद्धी चाणाक्ष होती. त्यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेत सामान्य पासून वरच्या पातळीपर्यंत कार्यपद्धती विशद केलेली आहे. त्यांनी ” वाचाल तर वाचाल! ” हा मूलमंत्र देशाला दिला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.बी भगत मुख्याध्यापक यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, मानवाचे कल्याण आणि विषमता नष्ट करण्या साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महान कार्य केलेले आहे. शिक्षणातून ज्ञान आत्मसात करणे आणि जिज्ञासा जागृत करणे हा त्यांचा देशवासीया साठी मुख्य हेतू होता. त्यांनी मोफत व सक्तीच्या शिक्षणावर भर दिला होता. त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस.एन. लोधे मॅडम आणि आभार प्रदर्शन एस. एम चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिनेश भाले बाबू, वामनभाऊ बोबडे, इंद्रभान अडबाले, विजय कोंगरे सहित विद्यार्थी वृंद उपस्थित होते.

