जमीन अधिग्रहित शेतकऱ्यांना न्याय देण्याची केली मागणी. कोठोडीत डब्लूसीएलच्या विरोधात पीडित शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन प्रकरण.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेरचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी आज दिनांक १३ फेब्रुवारीला केंद्रीय कोळसा मंत्री श्री जी किशन रेड्डी यांची डब्ल्यूसीएल गेस्ट हाऊस नागपूर येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोठोडी येथे १० फेब्रुवारीपासून डब्लूसीएलच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल सविस्तर चर्चा केली. या विषयाशी संबंधित त्यांना एक निवेदन पत्र दिले आणि यावर समाधानकारक तोडगा काढण्याची विनंती केली.
सावनेर परिसरातील पटकाखेडी, कोठोडी, आदासा व येरणगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वेस्टर्न कोल्ड फिल्डने ओपन कास्ट खदान सुरू करण्यासाठी २०२१ मध्ये अधिग्रहित केल्या. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असताना अद्यापही त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित केली नाही. तसेच पीडित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डब्ल्यूसीएलचे सीएमडी या आंदोलनाच्या बाबतीत गंभीर नसून हे प्रकरण चिघळत चालले आहे. त्यामुळे वेळीच तोडगा काढण्याची नितांत गरज आहे. गावांचे लवकर पुनर्वसन करण्यात यावे, चुकीच्या पद्धतीने झालेली मोजणी पुन्हा करावी, प्रत्येक घरमालकाला योग्य मोबदला मिळावा, शेतकऱ्याला न्यायालयाने दिलेल्या धोरणानुसार तीन महिन्याच्या आत नोकरी द्यावी, पुनर्वसन होईस्तोवर पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे, आंगेवाडा येथील ३० हेक्टर बाधीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या महत्त्वाच्या सहा मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या रास्त असल्याने डब्ल्यूसीएलने त्या त्वरित मार्गी लावाव्यात आणि त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती डॉ आशिष देशमुख यांनी श्री जी किशन रेड्डी यांना केली.
केंद्रीय कोळसा मंत्री श्री. जी. किशन रेड्डी यांनी याबाबतीत जातीने लक्ष घालून तोडगा काढू, असे आश्वासन आमदार डॉ. आशिष देशमुख यांना दिले. यावेळी डब्ल्यूसीएलचे सीएमडी, अधिकारी, भाजपाचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

